‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’   

नवी दिल्ली : २०२४-२५ या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर ६.५ टक्के होता, जो कोरोना काळानंतरचा सर्वात कमी आहे. आर्थिक प्रगतीशिवाय ’विकसित भारता’ची चर्चा करणे मूर्खपणाचे आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी शनिवारी केली. 
 
प्रियांका यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, उत्पादन क्षेत्राच्या कमकुवत कामगिरीमुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ७.४ टक्क्यांपर्यंत मंदावला. त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर चार वर्षांच्या नीचांकी ६.५ टक्क्यांवर घसरला. कोरोना काळानंतरची ही सर्वात मंद वाढ आहे.
 
भाजप सरकार आर्थिक आघाडीवर सतत अपयशी ठरत आहे. देशभरातील उद्योग कमी होत आहेत. औद्योगिक उत्पादन आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. देशात भयानक बेरोजगारी आहे आणि नवीन नोकर्‍या निर्माण होत नाहीत. लोकांचे उत्पन्न कमी होत आहे आणि आर्थिक असमानता वेगाने वाढत आहे, त्यामुळे मागणी आणि वापर देखील कमी होत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीशिवाय विकसित भारताची चर्चा केवळ पोकळ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Related Articles